मिता

मिता

मिता कोकणातल्या छोटया खेड्यात रहायची. तिचे गाव शांत, सुंदर आणि समुद्राकाठी वसलेले होते. तिचे बाबा मासळी विकायचे आणि आई घरी पापड, लोणची करुन विकायची. ह्यावर त्यांच्या कुटूंबाचा उदर निर्वाह चालत असे. रोज सकाळी पहाटे उठून मिताही त्यांच्या बरोबर समुद्र किनारी जात असे. तिला सकाळच्या उन्हात चमकणारी समुद्राची वाळू खूप आवडत असे. वाळूत ती अनेक प्रकारची नक्षी काढत असे. समुद्रातले अनेक रंगी मासेही तिला खूप आवडत असत.

तिचे बाबा मासे पकडत तेंव्हा जाळ्यात अडकलेल्या माश्यांची तडफड तिला अस्वस्थ करुन जात असे. तिने एक दिवस तिच्या बाबांना विचारले,” बाबा, आपल्या सारखेच सगळ्यांनी रोजच मासे पकडले तर समुद्रातले मासे एक दिवस संपून जातील? मग सगळ्यांनी बाजारात जाऊन विकायचे काय आणि खायचे काय?” मिताच्या ह्या प्रश्नावर आई-बाबा दोघांनाही हसू आले.

त्या दिवशी रात्री मिताच्या आईला अस्वस्थ करणारे स्वप्न पडले. तिने स्वप्नात पाहिले की समुद्रातले सगळे मासेच संपून गेले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणेच कठीण झाले आहे. आईने मिताच्या बाबांनाही हे स्वप्न सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे समुद्रावर जाण्याची तयारी झाली. मिताने बघितले की तिच्या आईने मासे ठेवण्याच्या नेहमीच्या टोपलीपेक्षा आकाराने लहान टोपली घेतली होती. तिला काही कळले नाही पण न विचारताच ती शाळेत गेली.

आल्यावर मिताने बघितले तर तिचे बाबा नारळाच्या झावळ्या करत होते. आई पापड करण्यात गुंग होती. आज दोघेही जण मासळी बाजारातून लवकर घरी आले होते. मिताने त्याबद्दल विचारताच आई म्हणाली,” मिता तुझ्या प्रश्नाने आम्हाला विचार करायला भाग पाडले आहे. आजपासून आम्ही ठरवले आहे की आवश्यकते नुसारच आपल्याला जितके मासे हवेत तितके मासे घ्यायचे. अधिक घेण्याचा हव्यास करायचा नाही. त्यामुळे आपला खर्च भागवण्यासाठी आम्ही इतरही उद्योग करायचे ठरवले आहेत. पण त्यासाठी निसर्गाची हानी मात्र अजिबात करायची नाही.” आईचे बोलणे ऐकून मिताने तिला अत्यानंदाने मिठी मारली.

Leave a Comment